टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 30 वर्षांचा झाला आहे. सिराजने 2020 मध्ये मनाशी ठरवले होते की, जर तो यावर्षी क्रिकेटमध्ये नाव कमवू शकला नाही, तर क्रिकेटला कायमचा रामराम ठोकणार, पण नंतर मेहनतीच्या बळावत नशीब पालटले.

समाचार इन: टीम इंडियाचा आघाडीचा बॉलर मोहम्मद सिराज याचा आज 30 वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस तो आनंदात साजरा करत असून असंख्य क्रिकेट प्रेमींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सिराज चा जन्म 13 मार्च 1994 रोजी हैदराबाद येथे झाला आणि तो हैदराबाद या आपल्या शहरावर प्रचंड प्रेम करतो हे त्यांनी वेळोवेळी आपल्या मुलाखतींमधून सांगितलेच आहे. सिराज ने आतापर्यंत भारतातर्फे 27 टेस्ट, 41 वनडे आणि 10 टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. सिराजने तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रमाने 74 68 आणि 12 अशा विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आज बीसीसीआय टीव्हीवर सिराज चा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या स्ट्रगल विषयी आणि शहर हैदराबाद विषयी भाष्य केले आहे.

मोहम्मद सिराज ने या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की, “मी 2020 मध्ये विचार केला होता की हे क्रिकेटसाठी मी शेवटचे वर्ष देईल आणि यानंतर क्रिकेटला कायमचा रामराम ठोकणार. तर आता आम्ही निघालो आहोत, हैदराबाद शहरातील माझ्या आवडत्या चहाच्या दुकानात, चला तर मग.. माझ्या आयुष्यात मला जेव्हा जेव्हा स्ट्रेस चा सामना करावा लागला आहे तेव्हा मी इथे येतो. येथे आल्यावर माझा सर्व स्ट्रेस नाहीसा होतो. जर मी स्ट्रगल पाहिले नसते, अनुभवले नसते तर सक्सेस ची किंमत मला कधीच समजली नसती.”

सिराज पुढे म्हणतो, “तर जाऊया, जिथे मी नेहमी चहा प्यायचो, जिथे मी वेळ घालवायचो, जिथे मी मित्रांसोबत क्रिकेट खेळायचो.. जेव्हा मी लहान होतो तेव्हा हा पूर्ण परिसर डोंगरांनी वेढलेला होता. हे सर्व तेव्हा नव्हते, इथे फक्त डोंगर असायचे. जेव्हा जेव्हा मी हैदराबाद मध्ये लँड करतो तेव्हा माझ्या मनात फक्त एकच विचार असतो की, आधी तर मी घरी जाणार आणि नंतर ईदगामध्ये जाणार. मी जगात कुठेही गेलो तरी मला इतके प्रसन्न नाही वाटत, परंतु येथे जेव्हा येतो तेव्हा मला इतकं प्रसन्न आणि मनाला शांती मिळते की त्याची सीमाच नाही, मी जेव्हा हैदराबादला जातो तेव्हा या ठिकाणी येतो म्हणजे येतोच.”

यादरम्यान सिराज ने म्हटले की, “ज्या ठिकाणी मी खेळत असताना वाढलो, तिथेही मी जात असतो. मला गाडीत बसून सॅड सॉंग ऐकायला खूप आवडतात. जेव्हा मी अठरा वर्षांचा होतो तेव्हा मी केटरिंग सेक्टरमध्ये जॉबसाठी जायचो. तेव्हा घरचे म्हणायचे की अभ्यास कर बाळ! पण मला क्रिकेट खेळायला खूप आवडायचे, आम्ही रेंटवर राहायचो आणि घरात वडील कमावणारे एकटेच होते, रेंट भरावे लागायचे, त्यामुळे केटरिंगच्या कामासाठी जायचो. त्यातून 100-200 रुपये मिळायचे. येणाऱ्या पैशातून घरात दीडशे रुपये दिले तरी 50 रुपये स्वतःकडे उरायचे. खूप भावनिक विषय आहे हा. कामासाठी जायची तेव्हा तेथील रुमाली रोटी पलटताना कधी कधी हात भाजायचे. असाच नाही मोठा झालो आयुष्यात खूप स्ट्रगल करून इथवर पोहोचलो आहे. आधी आमच्याकडे वडिलांची एक रिक्षा होती आणि एक प्लॅटिना मोटरसायकल होती, तिलाही धक्का देऊन चालू करावे लागायचे.”

सिराजच्या मित्रांनी सांगितले की सिराज मध्ये इंडियन क्रिकेटर झाल्यानंतर देखील कोणताच बदल पाहायला मिळाला नाही. सिराज ने 2020 नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही, त्याचे सातत्य आणि कष्ट त्याला पुढे घेऊन गेले आहेत. तसेच सिराजने शेवटी सांगितले की, जेव्हा आपण मनापासून मेहनत घेता, तेव्हा आपल्याला मेहनतीचे फळ जरूर मिळते. त्यासाठी एक लागू द्या, दोन वर्ष लागू द्या किंवा तीन वर्षे लागू द्या, फळ मिळणार हे मात्र नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *